देशात 2 महिन्यांनंतर उडणार विमाने, एअर इंडियानं आजपासून सुरू केली तिकीटांची बुकिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा 59 वा दिवस आहे. जवळपास दोन महिन्यापासून सुरु असलेल्या या लॉकडाऊनमध्ये आता हळूहळू परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. विशेष रेल्वेनंतर आता 25 मे पासून देशात काही विमान सेवाही सुरु होत आहे. एअर इंडियाने याची माहिती देताना आज (शुक्रवार) दुपारी 12.30 पासून बुकिंगची सुविधा सुरु करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

एअर इंडियाकडून याबद्दल airindia.in वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. सोबतच कस्टमर केअरशी संपर्क साधूनही नागरिकांना आणखी माहिती मिळवता येणार आहे. शुक्रवार (दि.22) दुपारी 12.30 वाजल्यापासून तिकिटाची ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार भारतीय एअरलाईन्स पुढील तीन महिन्यासाठी प्रत्येक अठवड्यामध्ये 8428 फ्लाईट्सचे उड्डाण करेल. हे उड्डाण 25 मे ते 25 ऑगस्ट पर्यंत चालेल. भारत सरकारने कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊननंतर ही घोषणा केली आहे. एअर इंडियासह इतर एअरलाईन्सने देखील आपली बुकिंग सुरु केली आहे. यामध्ये स्पाइस जेट चा समावेश आहे.

एअर इंडियाशिवाय इतर एअरलाईन्सकडूनही बुकिंगची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या आगोदर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत देशांतर्गत उड्डाणं लवकरच सुरु होणार असल्याची माहिती दिली होती. केंद्र सरकारकडून सध्या एक तृतिअंश विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत तिकीट दरही निश्चित करण्यात आले आहेत. सोबतच प्रवाशांसाठी काही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. देशातील मार्गांना सात विभागात विभागण्यात आले आहे. यामध्ये मेट्रो टू मेट्रो आणि मेट्रो टू नॉन मेट्रो शहरांसाठी फ्लाइट सेवा सुरु होणार आहे.

गाईडलाईन्सनुसार, विमानाच्या उड्डाणापूर्वी दोन तास अगोदर प्रवाशांना विमानतळावर पोहचावं लागेल. आपल्या सुरक्षेसाठी प्रवाशांना सुरक्षा गिअर्ससहीत फेस मास्क परिधान करणं आवश्यक आहे. तसेच सॅनिटायझरची बाटलीही प्रवाशांना सोबत बाळगावी लागेल. प्रवासादरम्यान कुणालाही जेवण दिलं जाणार नाही. पाणी असनावर मिळेल. चेक इन करताना केवळ एक बॅक घेऊन जाण्याची परवानगी प्रवाशांना देण्यात आली आहे.