भारतीय लष्करानं NSCN च्या 6 दहशतवाद्यांना केलं ठार, अनेक हत्यारे जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने नागा बंडखोरांच्या नॅशनॅलिस्ट सोशलिस्ट कौन्सिलच्या ऑफ नागालँडच्या ६ अतिरेक्यांना चकमकीत ठार केले आहे. या अतिरेक्यांना अरुणाचल प्रदेशातील तिनसुकियापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोंसा भागात ठार करण्यात आले. या मोहिमेत ठार झालेल्या सर्व अतिरेक्यांचा संबंध नागा अतिरेकी संघटना एनएससीएन (आयएम) शी असण्याची शक्यता आहे.

काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती, त्यानंतर त्यांनी या भागात शोध मोहीम राबवली, तर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. यादरम्यान ६ अतिरेकी मारले गेले. पहाटे साडेचारच्या सुमारास ही चकमक घडली. चकमकीच्या ठिकाणाहून सहा शस्त्रे व इतर शस्त्र साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या चकमकीत आसाम रायफलचा एक सैनिक जखमी झाला. या जवानाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असून त्याला जवळच्या लष्करी रुग्णालयात नेले जात आहे. अरुणाचल प्रदेशच्या काही भागात नॅशनॅलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड कार्यरत आहे. त्याविरोधात सेना सतत मोहीम राबवत आहे.