भारतानं सुनावल्यानंतर पाकिस्तानची बत्ती गुल ! इस्लामाबादमध्ये 2 भारतीय अधिकार्‍यांना सोडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायोगाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केल्यांनतर भारताच्या कठोर भूमिकेचा परिणाम दिसून आला आहे. पाकिस्तानने आता या दोन्ही अधिकाऱ्यांना सुखरुप सोडले आहे. भारत सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नवी दिल्ली येथील पाकिस्तान उच्चायुक्तच्या मुत्सद्दीला चांगलेच फटकारले. माहितीनुसार भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला या दोन अधिकाऱ्यांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना तातडीने सोडण्यास सांगितले होते. भारताने पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले कि, इस्लामाबादमधील भारतीय अधिकाऱ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि अशा प्रकारच्या कारवाया अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. तसेच, भारतीय अधिकाऱ्यांना त्रास दिला जाऊ नये. पाकिस्तानने कोणत्याही प्रकारे भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी करू नये … किंवा त्यांना अटक करू नये.

वास्तविक, इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायोगाचे दोन अधिकारी एका वाहनावर अधिकृत कर्तव्यासाठी उच्च आयोगाकडे जाण्यासाठी सकाळी 8.30 च्या सुमारास रवाना झाले, परंतु ते गंतव्यस्थानावर पोहोचले नाहीत. त्यांनतर बातमी समोर आली कि, पाकिस्तानने या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाकिस्तानस्थित भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तातडीने भारत सरकारला कळविले.

दरम्यान, हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तच्या दोन अधिकाऱ्यांना भारताने निलंबित केल्याच्या दोन आठवड्यांनंतर ही घटना घडली. अलीकडेच, पाकिस्तानी उच्चायोगाचे दोन अधिकारी आबिद हुसेन आणि मोहम्मद ताहिर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती, जेव्हा ते रुपयांच्या बदल्यात एका भारतीय नागरिकाकडून भारतीय सुरक्षा आस्थापनांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे मिळवत होते. भारत सरकारने त्यांच्यावर बंदी घालत त्यांच्या कामाला मुत्सद्दी मोहिमेचा सदस्य म्हणून बेकायदेशीर आणि देशाविरूद्ध असल्याचे मानले होते.

नुकतेच पाकिस्तानात वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी गौरव अहलुवालिया यांच्या गाडीचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सदस्याद्वारे पाठलाग करण्याची एक घटना समोर आली होती. ‘एएनआय’ ने दिलेल्या माहितीनुसार, गौरव अहलुवालियावर नजर ठेवण्यासाठी आयएसआयने त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोटारी आणि बाईकका जमाव लावला होता. या अहवालात म्हटले होते की, आयएसआयचे हेर भारतीय मुत्सद्दीवर नेहमीच नजर ठेवून असतात. इतकेच नव्हे तर वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओही प्रसिद्ध केला. मुत्सद्दी कारच्या पाठलाग केल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

भारताने या प्रकरणांची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देत पाक एजन्सींना स्पष्टपणे सांगितले होते की, अशा घटना यापुढे घडू नयेत. भारताने म्हटले होते कि, अश्या प्रकारच्या घटना स्पष्टपणे मुत्सद्दी संबंधांवर व्हिएन्ना अधिवेशन, 1961 चे थेट उल्लंघन आहे आणि उच्च आयोगाचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी ही पाकिस्तान सरकारची आहे. दरम्यान, अशी घटना पहिल्यांदाच घडली नव्हती. यापूर्वी 8 मार्च रोजी भारतीय उच्चायोगाच्या प्रथम सचिवांच्या कारचा पाकच्या सुरक्षा एजन्सींनी पाठलाग केला होता.