दहशतवादी कसाब बद्दल मुंबईच्या Ex CP राकेश मारियांच्या खुलाशानंतर भाजपनं काँग्रेसला चांगलंच घेरलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मुंबई हल्ल्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकामध्ये लिहीले की, “अजमल कसाब हा हिंदू होता आणि 26/11 चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद होता असं लष्कर ए तोयबाला सिद्ध करायचं होतं. त्याला तिथेच मारले असते तर सर्व पेपर आणि न्यूज चॅनेल्सवाल्यांनी अजमल हा हिंदू आतंकवादी होता असे हेडिंग दाखवलं असतं.”

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहले आहे की, “26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जागीच ठार मारले असते तर कदाचित जगाने ही घटना हिंदू दहशतवाद मानली असती. 26/11 हल्ला घडवून आणणारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाला भारतात हिंदूंच्या वतीने दहशतवादी हल्ला झाला असे भासवायचे होते. त्यासाठी कसाबच्या हाती हिंदू धर्मातील धागा बांधण्यात आला होता.”

यावरूनच पियुष गोयल हे काँग्रेसविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. पियुष गोयल म्हणाले, “राकेश मारिया हे सगळं आत्ता का सांगत आहेत ? जेव्हा ते पोलीस आयुक्त होते तेव्हाच त्यांनी हे सत्य जगासमोर आणायला पाहिजे होते. पोलीस सेवेत असताना एखादी माहिती जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे असेल तर ती त्यांनी सार्वजनिक करायला पाहिजे. 26/11 च्या हल्ल्यावेळी एक मोठा कट काँग्रेसने रचला होता. काँग्रेसने रचलेलं कुंभाड या पुस्तकामुळे समोर आलं आहे. पी.चिदंबरम यांच्या सांगण्यावरून हिंदू दहशतवाद्यांची एक बोगीच निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता”, असे गोयल यांनी म्हटले आहे.