Smart India Hackathon 2020 : ‘नोकरी’ करणारे घडवण्याऐवजी ‘रोजगार’ देणारे बनवण्यावर जोर : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या ग्रँड फिनाले प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी सरकारने आणलेल्या नवीन शिक्षण धोरणाचा उल्लेख करत म्हटले की, हे नोकरी करणार्‍यांऐवजी नोकरी देणारे बनवणार्‍यांवर जोर देते. हा आपला विचारात आणि अ‍ॅप्रोचमध्ये बदल करण्याचा प्रयत्न आहे. नवीन शिक्षण धोरणातून भारतातील भाषा पुढे जातील आणि त्यांचा विकास होईल. हे धोरण भारताचे ज्ञान आणखी पुढे घेऊन जाईल.

असे आव्हान नाही, ज्यास आमचे तरूण तोंड देऊ शकत नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील गरीबांना एक चांगले जीवन देण्याचे लक्ष्य प्राप्त करण्यात तुम्हा तरूणांची भूमिका खूप महत्वाची आहे. मला नेहमी वाटते की, देशासमोर येणारे असे एकही आव्हान नाही, ज्यास आमचा तरूण टक्कर देऊ शकत नाही आणि त्यावर उपाय शोधून काढू शकत नाही. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनद्वारे मागील वर्षी अद्भुत शोध देशाला मिळाले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, या हॅकेथॉनमधील सहभागी तरूण सहकारी, देशाच्या गरजा समजून, देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, नवनवीन मार्ग शोधण्याचे काम करतील.

प्रत्येक आव्हानासमोर यशस्वी ठरला आमचा तरूण
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नवीन शिक्षण धोरणात एकीकडे स्थानिक लोककला, विद्या आणि ज्ञानाला स्वाभाविक स्थान देण्याचा विचार केला आहे, तर दुसरीकडे प्रमुख जागतिक संस्थांना भारतात कॅम्पस उघडण्यासाठी आमंत्रणसुद्धा दिले आहे. देशातील युवाशक्तीवर माझा नेहमीच पूर्ण विश्वास राहीला आहे. देशातील तरूणांनी सातत्याने सिद्ध केले आहे. नुकतेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी फेस शील्ड्ची डिमांड एकदम वाढली होती. ही मागणी थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीसह पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशातील युवक पुढे आले.

भारताच्या समृद्ध भाषांना मिळेल मजबूती
पीएम मोदी यांनी म्हटले की, नव्या शिक्षण धोरणामुळे जगालाही भारतातील समृद्ध भाषांची ओळख होईल. एक मोठा लाभ हादेखील आहे की, विद्यार्थ्यांना आपल्या सुरूवातीच्या शिक्षणात आपल्या भाषेत शिक्षण घेता येईल. तसेही आज जीडीपीच्या आधारावर जगातील प्रमुख 20 देशांची यादी पाहिली तर बहुतांश देश आपली गृहभाषा, मातृभाषेतच शिक्षण देत आहेत. हे देश आपल्या युवकांचे विचार आणि समज आपल्या भाषेत विकसित करतात आणि जगाशी संवादासाठी दुसर्‍या भाषांवरही जोर देत आहेत.

नोकरी देणारे बनवणार्‍यांवर जोर
आपल्या देशात स्थानिक भाषांना आपल्या आवस्थेतच सोडून देण्यात आले. तिला पुढे जाण्याची आणि वाढण्याची संधी खुप कमी मिळाली. आता एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे बदल केले आहेत, त्याने भारतातील भाषा पुढे जातील, त्यांचा विकास होईल. त्या भारताचे ज्ञान वाढवतील, भारताच्या एकतेलाही वाढवतील. नवीन शिक्षण धोरण नोकरी करणारे निर्माण करण्याऐवजी नोकरी देणारे बनवण्यावर जोर देते. हा आपला विचार आणि अप्रोचमध्ये रिफॉर्म आणण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण व्यवस्थेत आता एक सिस्टमॅटिक रिफॉर्म, शिक्षणाचा इन्टेंट आणि कन्टेंट दोन्हीत बदल करण्याचा प्रयत्न आहे.

शिकणे, प्रश्न विचारणे आणि सोडवणे सोडू नका
पीएम मोदी म्हणाले, आपल्या संविधानाचे मुख्य शिल्पकार आणि देशाचे महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शिक्षण सर्वांच्या आवाक्यात असायला हवे. नवे शिक्षण धोरण याच विचारांना समर्पित आहे. सध्याचा काळ शिकणे, रिसर्च करणे आणि इनोव्हेशनवर फोकस करण्याचा आहे. नव्या शिक्षण धोरणात असाच प्रयत्न करण्यात आला आहे. मी युवकांना तीन गोष्टी न सोडण्याचे आवाहन करतो – शिकणे, प्रश्न विचारणे आणि प्रश्न सोडवणे…

मागील सरकारवर साधला निशाणा
पीएम मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिक्षणावरून मागील सरकारच्या उदासिनतेवर निशाणा साधला. ते म्हणाले, जुन्या शिक्षण व्यवस्थेने देशाला मोठी लोकसंख्या अशी दिली आहे, जी शिक्षित तर आहे परंतु जे तिने शिकले आहे त्यापैकी बहुतांश तिच्या उपयोगी येत नाही. डिग्री मिळवली तरी त्यांना आपल्यात कमतरता जाणवते. ऑनलाइन एज्युकेशनसाठी नव्या साधनांची निर्मिती असो की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सारखे अभियान… आमचा प्रयत्न हा आहे की, भारताचे शिक्षण आणखी अधुनिक व्हावे, मॉडर्न व्हावे, येथे प्रतिभेला पूर्ण संधी मिळावी.

21 व्या शतकात वेगाने बदलावे लागेल
पंतप्रधान म्हणाले, नवे शिक्षण धोरण 21 व्या शतकातील तरूणांचे विचार, त्यांच्या गरजा, त्यांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पाहून बनवण्यात आले आहे. आम्हाला गर्व आहे की, मागील शतकात आम्ही जगाला एकापेक्षा एक शास्त्रज्ञ, टेक्निशियन, टेक्नॉलॉजी एंटरप्रिन्यूर दिले आहेत. परंतु हे 21 वे शतक आहे आणि वेगाने बदलणार्‍या जगात भारताला सुद्धा आपली प्रभावी भूमिका बजावण्यासाठी तितक्याच वेगाने बदलावे लागेल. आमचा प्रयत्न आहे की, युवा टॅलेंटला संधी मिळावी.

हेल्थकेयरमध्ये डेटा ड्रिव्हेन सोल्यूशनने मिळेल मदत
पीएम मोदी म्हणाले, मागील सर्व एडिशनमध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली. तुम्हाल समजून घेण्याची, ऐकण्याची संधी मिळाली. आज मी म्हणतो की, देशातील तरूणांना देशाच्या आव्हानांशी जोडणे आणि त्यांच्या इनोव्हेटवर आधारित सोल्यूशन तयार करण्याचे जे लक्ष्य घेऊन आम्ही चाललो होतो, त्यामध्ये आपण सर्व युवा सहभागींनी मोठे योगदान दिले आहे. यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. हेल्थकेयरमध्ये डेटा ड्रिव्हेन सोल्यूशनने खुप मोठा बदल होऊ शकतो. यातून आपण गरीबांपर्यंत आणि दूरच्या गावांपर्यंत अफोर्डेबल हेल्थकेयर सिस्टम पोहचवू शकतो.

स्मार्ट पोलिसींगवर सुद्धा जोर
पंतप्रधानांनी इनोव्हेटीव्ह विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधला. एका विद्यार्थ्याला त्यांनी विचारले, मुले आणि महिलांच्या सुरक्षेसाठी एखादी अलर्ट सिस्टम विकसित होऊ शकते का, जी प्रॉपर्ली इंटिग्रेटेड असेल. ही सिस्टम स्कूल बस, ऑटो, कॅबला पोलीस कंट्रोल रूमशी रियल टाइम कनेक्ट होऊ शकते. पंतप्रधानांनी स्मार्ट पोलिसींगवर सुद्धा जोर दिला. त्यांनी एका सहभागी तरूणाला विचारले की, पोलिसींगला प्रभावी बनवण्यासाठी आर्टिफिशियल इन्टेलिजन्स खुप उपयोगी ठरू शकते का. जर आपण यासाठी काही करू शकतो तर हे प्रशासकीय सुधारणेसाठी महत्वपूर्ण आहे.