कृषी विधेयकाला विरोध : शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज‘भारत बंद’चा नारा दिला आहे. काँग्रेसने काल दोन महिन्यांच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली असून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. भाजपने मात्र काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेतीविधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत. काँग्रेससह 15 विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.

काँग्रेसमध्ये आता समज असलेले नेते राहिले नाहीत, जे नेतृत्व करतात त्यांना देशात कोणी विचारत नाही. त्यांचे पक्षातही कोणी ऐकत नाही. ते देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. हमीभाव हा कायद्याचा भाग नाही, तो नेहमीच प्रशासकीय धोरणाचा हिस्सा आहे. काँग्रेसकडे शेती विधेयकावर काही बोलण्यासारखे नसल्याने हमीभावाबद्दल दुष्प्रचार केला जात आहे. खरीप आणि रब्बी हंगामासाठी केंद्राने हमीभाव जाहीर केले आहेत. त्यामुळे हमीभाव रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तोमर म्हणाले.