NRC देशभरात लगेच लागू करणार नाही : केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यादी बनवण्याचे ठरले असले तरी त्याची अंमलबजावणी केव्हा पासून करायची याबाबत अजून निर्णय झालेला नाही. एनआरसीचे नियम तयार होणे बाकी आहे. तसेच विधी विभागानेही त्यावर अद्याप कोणतीही प्रक्रिया केलेली नसल्याने एनआरसी लगेचच लागू केला जाणार नाही. यासाठी काही कालावधी लागणार आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे. रेड्डी यांच्या या विधानामुळे राष्ट्रीय नोंदणी कायद्याची अंमलबजावणी लांबवणीवर पडल्याचे दिसत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आमच्या राज्यात एनआरसी लागू करणार नाही, अशी विरोधी भूमिका घेतली आहे. यावर गृह राज्यमंत्री रेड्डी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. एनआरसीबाबत रेड्डी म्हणाले, एनआरसीचा भारतातील कोणत्याही नागरिकावर कोणताही परिणाम होणार नाही, हे सांगणारी जाहिरात आम्ही सर्व वर्तमानपत्रांमध्ये दिली आहे. कारण, एनआरसी देशातील सर्वच राज्यामध्ये लागू होणार, मुस्लिमांना देशाबाहेर काढणार, अशा अफवा काही लोक पसरवत आहेत. एनआरसी अजूनही लागू करण्यात आलेला नसून नियम तयार करण्याचे काम सुरू आहे, असे रेड्डी म्हणाले.

दरम्यान, जनगणना आणि एनपीआरच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या संख्येने कर्मचारी वर्गाची गरज भासणार आहे. या कार्यवाहीचे स्वरूप मोठे असल्याने कर्मचारीही तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे काम करणे देशातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक करावे, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, राज्य सरकारांनी मान्यता दिल्याशिवाय असे करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीत राज्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/