…म्हणून नवनीत राणा रडल्या आणि प्रचार सोडून फिरल्या माघारी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विकोपाला गेल्याने महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. अंतर्गत गटबाजीतुन झालेल्या हाणामारीचे दृश्य पाहून त्यांना रडू कोसळे आणि त्या प्रचार अर्धवट सोडूनच माघारी फिरल्या.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी  दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नवनीत राणा  काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह पठाण चौक परिसरात पोहोचल्या होत्या.

यावेळी माजी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी रावसाहेब शेखावतांना सोबत का आणले म्हणून नवनीत राणा यांच्याशी वाद घातला. रावसाहेब शेखावत कारच्या खाली उतरल्यावर आसिफ तवक्कल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेखावतांना शिवीगाळ करीत वाद घातला. इतकेच नव्हे तर, काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या समर्थ आणि विरोधकांमध्ये पठाण चौकात हाणामारीही झाली. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून नवनीत राणा यांना रडू आले आणि त्या प्रचार अर्धवट सोडूनच  माघारी परत फिरल्या.