आठवलेंनी नक्षलवाद्यांना केले ‘हे’ आवाहन

रायपूर : वृत्तसंस्था – रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी नक्षलवाद्यांना आवाहन केले आहे. ‘नक्षलवाद्यांनी बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारावा’ असे आवाहन आठवेल यांनी केले आहे. छत्तीसगडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार लोकसभा निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रचारासाठी आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.

यावेळी बोलताना आठवले म्हणाले, नक्षलवाद्यांना जर गरीब आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी नक्षलवाद सोडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावं आणि मतदान करावं असे आठवले म्हणाले.

छत्तीसगड मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या नक्षली हल्ल्याचा आठवले यांनी निषेध केला. नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या यंदा किमान ८ जागा निश्चित निवडून येतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षांत चांगले काम केले असून त्यांना पुन्हा केंद्रात देशसेवेची संधी देण्यासाठी भाजप एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केले.

छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा असून त्यापैकी २ जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे तर अन्य ९ जागांवर भारतीय जनता पार्टीला आरपीआयने पाठिंबा दिला आहे.