खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर प्रथमच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश नक्की झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे जाहीरपणे आपल्यावर अन्याय झाला असून देवेंद्र फडणवीसांना जबाबदार ठरवत असून यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते विधान भवन येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर बोलताना राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. भाजपाचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता,असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर खडसे यांच्या पक्षप्रवेशाविषयी मला काहीही माहित असल्याचे देखील तत्यांनी यावेळी स्पष्ट केले. याचबरोबर जलयुक्त शिवाराविषयी करण्यात येणाऱ्या चौकशीवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. ही चौकशी जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचे देखील पवारांनी स्पष्ट केले आहे.

याविषयी आधिक बोलताना पवार म्हणाले, सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होत. त्यांनीच तसं म्हटले होतं, असेदेखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीबाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाला राज्य सरकार मार्फत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील अनेक भागाला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून संबधित भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर, पंढरपूर, सांगली यासह राज्यातील अनेक भागाला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचे पंचनामे करून मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. ज्या भागात नागरिक अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ज्या भागांचं नुकसान झालं आहे. तेथील नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार आहे.