आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेटवर्कबाहेर असतात असा आरोप केला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार पलटवार केला आहे. अलीकडे माझ्यावर दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले, बिनबुडाचे आरोप करून राज्यात स्थिती निर्माण करू नये. सध्या कोरोनाची बिकट स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करु नये, असा इशाराही भाजप नेत्यांना दिला आहे.

भाजपकडून होणाऱ्या आरोपांमुळे अजित पवार संतापले होते. त्यांनी थेट आपले आठवड्याचे नियोजनच सांगून टाकले आहे. ते म्हणाले मी दररोज सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटीसाठी सर्वांना उपलब्ध असतो. मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सर्वांशी दिवसभर संपर्क, संवाद सुरु असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात. मंत्रालयात सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मी हजर असतो. पुण्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी बारामतीत दिवसभर कार्यक्रम सुरु असतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरु असलयाचे त्यांनी सांगितले.

भाजप नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडे वापरावी: अजित पवारांचा सल्ला
कोरोनामुळे राज्याची बिकट अवस्था झाली आहे. रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा, रेमेडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता आदी प्रश्न सोडवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझा सातत्याने मुख्यमंत्री महोदयांशी, सहकारी मंत्र्यांशी, लोकप्रतिनिधींशी, विभागीय आयुक्तांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद सुरु आहे. उद्योग क्षेत्राशीही चर्चा सुरु असून जनतेला या संकटात दिलासा देण्याचे माझे काम सुरु आहे. आजची सर्वोच्च प्राथमिकता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे आणि रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करणे ही आहे. मात्र खोटी वक्तव्ये करून राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन राज्याला अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी असा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राज्यातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांची यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम करत असून कोरोनाविरुद्धची लढाई महाराष्ट्र जिंकेलंच, असा विश्वास व्यक्त करत हि लढाई कमकुवत करण्याचं पाप विरोधी पक्षांनी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.