खा. अमोल कोल्हेंचा मोदी सरकारला सवाल; म्हणाले – ‘देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का?’ (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे अनेक नागरिकांची परिस्थिती बिकट झालीय. भारतात तर मृत्यूची संख्या अधिक आहे. देशात आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडत आहे. सरकार प्रयत्न करून देखील प्राणवायू, कोरोना प्रतिबंधक लस, रेमडीसीवीर, व्हेंटिलेटर्स यांचा तुटवडा निर्माण होताना दिसत आहे. या परिस्थितीवरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, कोरोनामुळे देशातील परिस्थिती या व्हिडिओच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये दिल्लीत नवीन संसद भवन आणि पंतप्रधानांचे नवे निवासस्थान असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरुनही त्यांनी टीका केली आहे. तर देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का?, असा जोरदार टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. कोल्हे यांनी देशातील सद्यस्थितीवर कवितेच्या माध्यमातून परखड भाष्य केलं आहे.

कोरोना बाधित रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे अधिक हाल होत आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्ये अशी बिकट परिस्थिती निर्माण झालीय. अनेक नागरिकांनी यावरून सामाजिक नेटवर्किंगवर संताप व्यक्त केला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे म्हणत सामाजिक नेटवर्किंगवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. तर भारतात गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले व ४१२० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी ३६२७२७ नवे कोरोना रुग्ण सापडले आणि ३५,२१८१ जण बरे झाले. कोरोना विषाणू रुग्णांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ असून त्यामधील १,९७,३४,८२३ जण बरे झाले आहेत.

या दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे CM उद्धव ठाकरे, पश्चिम बंगाल CM ममता बॅनर्जी , तामिळनाडूचे CM एम. के. स्टॅलिन अशा भारतातील एकूण बारा पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. राजधानी दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प यामध्ये दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा आणि त्यासाठी देण्यात आलेला निधी प्राणवायू आणि लसींचा साठा मिळवण्यासाठी वापरावा तसेच, नागरिकांसाठी मोफत लसीकरण, केंद्र सरकारने पारित केलेले ३ कृषी कायदे अशा एकूण ९ मुद्द्यांचा या पत्रामध्ये समावेश केला आहे.