शरद पवारांचा मोठा दावा, म्हणाले – ‘प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्ली सीमेवर मागील तीन महिन्यापासून आंदोलन करत आहेत. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी रॅलीतील काही उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे.

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडगूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यामध्ये लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यामध्ये सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आल्याचा दावा करत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे.

सरकार फक्त आश्वासन देते, करत काहीच नाही

शरद पवार पुढे म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळवा, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. परंतु, केंद्र सरकार केवळ आश्वासनच देत आहे, प्रत्यक्षात काहीही करत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या यू-टर्नवर आश्चर्य – मोदी

दरम्यान, लोकसभेत बोलताना, शरद पवार यांनीच यापूर्वी केंद्रीय कृषीमंत्री असताना कृषी कायदे लागू करण्यासाठीचे वक्तव्य केले होते. मग आता विरोध का ? असा प्रश्न करत, शरद पवार यांनी कृषी कायद्या संदर्भात अचानक यू-टर्न कसा घेतला याचे आश्चर्य वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.