ठाकरे सरकारकडून भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात, शरद पवारांचा थेट गृहमंत्र्यांना फोन, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने राज्यातील भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आहे. माझी सुरक्षा कमी करा, असे पवारांनी देशमुख यांना सांगितले आहे. मी स्वत: सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. मला दिलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या, असे पवारांनी गृहमंत्र्याला सांगितल्याचे कळते.

महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. सरकारने फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढले आहे. तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी केली आहे. यापुढे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा राहणार नाही. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी चिंता व्यक्त केली होती. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे.

काही मंत्र्यासह इतर नेत्यांच्या सुरक्षेतही कपात
काही मंत्र्याची सुरक्षाही कमी केली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.