Nawab Malik : ‘जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का ?’, NCP कडून पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) बुधवारी (दि.13) राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan) यांना अटक (Arrest) केली. ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर NCB ने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

NCB ने केलेल्या छापेमारीमध्ये सितारा हॉटेलमधून एका विदेशी नागरिकाला देखील ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. नवाब मलिक यांच्या जावयाच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे त्यांच्या नेत्याची साथ देत असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून या प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर येत आहे.

जावयाचं काय केलं याच खापर सासऱ्यावर का ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, नवाब मलिक यांच्या जावयांना झालेल्या अटकेबाबत त्यांना माहिती नाही. पण ते असंही म्हणाले की सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. पुन्हा एकदा त्यांना यावर विचारले असता त्यांनी, जावयानं काय केलं त्याचं खापर सासऱ्यावर का फोडायचं, अशी प्रतिक्रिया दिली.

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही – नवाब मलिक
जावयला अटक केल्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, असे मलिक यांनी सांगितले.