स्थिर सरकार देण्यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीची बोलणी झाली होती ? ‘या’ दिग्गज मंत्र्यांनं केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारची वर्षपूर्ती असतानाच लेखिका प्रियम गांधी (Writer Priyam Gandhi) यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर लिहिलेल्या ‘Trading Power’ पुस्तकावरून आता अनेक राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. या पुस्तकात राष्ट्रवादीवर जे आरोप केले आहेत. ते आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांनी फेटाळून लावत, हे पुस्तक लेखिकेला पुढे करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच (Leader of Opposition Devendra Fadnavis) लिहिल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लेखिका प्रियम गांधी यांनी या पुस्तकात, राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती, स्थिर सरकार देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार होती. मात्र, शरद पवारांचं मन बदललं आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी पार पडला. या संपूर्ण घडामोडीवर प्रकाश टाकला आहे, तर मग खरंच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत बोलणी केली होती का? अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावत म्हणाले की, हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांचे आहे, ज्यांनी बेईमानीने सरकार बनवलं, त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचे काम केले आहे, ज्यापद्धतीने भाजपने 80 तासांचे सरकार बनवले, त्यावरून भाजपची प्रतिमा मलिन झाली, यावर पडदा टाकण्यासाठी असे पुस्तक समोर आणले आहे. फडणवीस यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आहे काय पुस्तकात ?

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेत्यांनी वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे त्यांनी फडणवीसांना सांगितले, त्यानंतर फडणवीसांनी तातडीने अमित शाह यांच्यासाेबत चर्चा केली. दुसऱ्याच दिवशी दिल्लीत शाह यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक झाली, या बैठकीला शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत शरद पवार यांनी स्वत: अमित शाह यांना भाजपसोबत येण्यास तयार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री कोणाचा असेल आणि मंत्रिमंडळ फॉर्म्यूला कसा असेल, यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर लोकांच्या स्थितीचा आढावा पाहून राज्याला स्थिर सरकारची गरज आहे असे सांगत राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करणार होते. 28 तारखेला शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना-काँग्रेसही सरकार बनवण्याचा प्रयत्नात होते. मात्र, शरद पवारांच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही.

शिवसेना-काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अधिकार येतील यादृष्टीने शरद पवारांनी कदाचित विचार करून पुन्हा मन बदलले असावे, असा दावा लेखिकेने या पुस्तकात केला आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत लेखिकेने हा दावा केला होता.
दरम्यान, शरद पवारांनी निर्णय बदलल्यानंतर अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी विरोध केला, तीन पक्षाचे सरकार चालू शकत नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे भाजपला पाठिंबा द्यावा, असे अजित पवारांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने पुन्हा फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा अजित पवार ठरल्याप्रमाणे भाजपला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले गेले. फडणवीसांनी अजितदादांना हे खरे आहे का, असे विचारले तेव्हा पवारांनी माझ्यासोबत 28 आमदार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढील घटना घडली होती, असे सांगण्यात आले आहे.