सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला सोडलेली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अकलूज येथे पत्रकारांनी शरद पवार यांना अहमदनगर लोकसभेच्या जागेसंदर्भात विचारले होते. त्यावर शरद पवार यांनी उत्तर देखील दिले. मात्र, शरद पवार यांनी दिलेले उत्तर तेथील आवाजामुळे पत्रकारांना व्यवस्थित ऐकु आले नाही. त्यामुळे हा गोंधळ उडाला असे सांगण्यात येत आहे.
काही प्रसारमाध्यमांनी अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षासाठी सोडली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून याबद्दलच्या बातम्या तथ्यहीन आहेत.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 1, 2019
अहमदनगर लोकसभेची जागा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडण्यात आल्याचे वृत्त वार्यासारखे पसरले होते. मात्र, आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडली नसल्याचे सांगितले आहे.