वाद चिघळणार ! साईबाबा जन्मस्थळावरून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.

हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण पाथरी हेच साई बाबा यांचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणून व्हावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी घेतली आहे. आमचा वाद मिटला आहे आम्ही बंद मागे घेत आहोत, अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी घेतली. मात्र पाथरीला दिलेल्या जन्मस्थानाचा मुद्दा निकाली निघाला का? यावर मात्र शिर्डीकरांनी भाष्य केले नाही.

पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीतील ग्रामस्थांचं शिष्टमंडळ यांची मुंबईत बैठक झाली.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी झाली आणि शिर्डीतील ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. ‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात पाथरीला जन्मस्थळ म्हणून निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या. राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पाथरीचा विकास साई जन्मस्थळच्या दृष्टीने व्हावा,’ अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिर्डीचे ग्रामस्थ आक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –