पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात अनिल गोटे यांनी भाजपाच्या भूमिकेवर टीका केली आहे. गोटे यांनी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातही एक खुलासा केला आहे. फडणवीस यांचे टरबुज्या हे नाव सर्वश्रुत होण्यामागे भाजपाचे नेतेच असल्याचा दावा गोटे यांनी केला आहे.
भाजपामधील नेत्यांचे बारसे अन्य कुणाला करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही असा टोला गोटे यांनी पत्रकामधून लगावला आहे. एकमेकांमधील द्वेष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूक बारसे घातले. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे. आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झाले आहे. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय?, असा टोला गोटे यांनी पत्रकामधून लगावला आहे.
भाजपामध्ये नावे छोटी करुन वापरण्याची पद्धतच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपामध्ये स्वता:च नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पद्धत आहेच. नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात अमित शहांना ‘मोटाभाई’ म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हणत असावेत, असा टोला गोटे यांनी लगावला आहे. दरम्यान, पडळकरांच्या वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा व देशातील सर्वोच्च नेत्यांच्या क्षेणीतील नेते शरद पवार यांना अवमानास्पद व हीन दर्जाची उपमा देऊन पातळी सद्यस्थितीतील महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची राजकारणीत देशभरात लक्षात आली आहे. असेही गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.