आव्हाडांचा बिग बी यांना सवाल, म्हणाले – ‘अमिताभजी, सध्या तुम्ही पेट्रोल भरत नाही की बिल पाहात नाही ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात गेल्या २१ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोलच्या दरात सुमारे ९ रुपयांपर्यंत तर डिझेलच्या दरात सुमारे ११ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल अभिनेता अक्षय कुमारला काही प्रश्न विचारले होते. दरम्यान, आज पुन्हा आव्हाड यांनी याचं मुद्द्यावरुन महानायक अमिताभ बच्चन यांना घेरत ८ वर्षांपूर्वीच्या ट्विटवरुन उपरोधक शैलीत टोले लगावले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? तुमच्या हातात येणार इंधनाचं बिलही तुम्ही पाहत नाही का? आता तुम्ही बोललंच पाहिजे. हीच ती वेळ आहे. ती निश्चितच पक्षपाती नसेल, अशी आशा आहे. तसेच डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये? असा अमिताभ यांच्या स्टाईलमध्ये खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनमोहन सिंह सरकार असताना इंधन दरवाढीवरुन अमिताभ बच्चन यांनी एक जोक तयार करुन ट्विट केला होता. त्यात पेट्रोल विक्रेता म्हणतो, कितीचं पेट्रोल टाकू. त्यावरती वैतागलेला मुंबईकर म्हणतो, दोन-चार रुपयांचं पेट्रोल कारवर टाक. कार जाळायची आहे. अमिताभ यांचं हे ट्विट त्यावेळी खूप व्हायरल झालं होत. याच ट्विट चा संदर्भ घेत जितेंद्र आव्हाड यांनी अमिताभ बच्चन यांच्यावरती निशाणा साधला आहे.

अक्षय कुमारलाही विचारले प्रश्न
इंधन दरवाढीवरुन आव्हाड यांनी अक्षय कुमारला सुद्धा काल ट्विटवरुन खोचक प्रश्न विचारले होते. ‘अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का? तू कार वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, ‘ असं आव्हाड यांनी म्हटलं होत. २०११ साली इंधन दरवाढीवरुन बोलणाऱ्या अक्षय ने आताही व्यक्त व्हावं, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.