महाराष्ट्रात राजकीय मुले पळवणारी टोळी सक्रिय : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसला नगरची जागा कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही या शक्यतेचा अंदाज सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी  काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विखे पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी पुरेपूर केला आहे. त्यांनी नगर लोकसभा उमेदवारीच्या माध्यमातून विखे पाटील घराण्याचा जुना संघर्ष पुन्हा उकरून काढला आहे.  या संघर्षापासून फारकत घेऊन सुजय विखेंनी भाजपचा रस्ता धरला आहे.

दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिव्हारी लागला आहे. याची पहिली पोच जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यांनी भाजपला मुले पळवणाऱ्या टोळीची उपमा दिली आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेस भाजपवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे.