मंदिराचा मुद्दा घेऊन भाजप राजकारण करतेय : खासदार सुनील तटकरे

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – देशावरील कोरोनाचे संकट अद्याप टळलं नसताना मंदिरे खुली करुन संकटाला आमंत्रण देण्याची वेळ येऊ शकते. मात्र, राज्यातील भाजप नेते हे मंदिर खुली करण्याचा पवित्रा घेत राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असून हे योग्य नसल्याची टीका खासदार सुनील तटकरे यांनी भाजपवर केली आहे. अलिबाग शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुनील तटकरे म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा काही प्रमाणात कमी होत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमाने हळूहळू टाळेबंदी शिथिल करीत असून व्यवहार सुरु झाले आहेत. अशावेळी भाजपकडून राजकारण केले जात आहे. मंदिर उघडण्याच्या दृष्टीने भाजपकडून आंदोलने केली जात आहे. परंतु कोरोना महामारी ही अद्याप नष्ट झालेली नाही असे असताना मंदिरे उघडून संकटाला आमंत्रण देण्याबाबत भाजप आग्रही आहे. त्यामुळे अशा संकट काळात भाजपने राजकारण न करता संयमी भूमिका घेण्याची गरज असल्याची टीका त्यांनी केली.

सुनिल तटकरे यांनी आगामी निवडणुकी संदर्भात बोलताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार असून समन्वयक भूमिकेतून आगामी निवडणुकीत पक्ष सामोरे जाणार आहे. अलिबागमध्ये पक्ष हा कमी पडत असला तरी कार्यकर्त्यांना पक्षा कडून उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच आगामी काळात जिल्ह्यात सकारात्मक भूमिका घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे. यावेळी अलिबाग मधील पत्रकारांचा तटकरे यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

जीवनात ही घडी अशीच राहू दे
शेकाप आमदार जयंत पाटील हे महाविकास आघाडी सोबत आहेत का आणि आपली मैत्री अद्याप आहे का यावर तटकरे यांनी, शेकाप हा महाविकास आघाडी सोबत आहे. आमदार जयंत पाटील यांच्या मैत्रीबाबत ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.