आ. रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल, म्हणाले – ‘भाजपचे सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र हा अहवाल त्यांनी तयार केलाच नाही. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिकांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचे काही अनुभवी नेत्याचे म्हणणे आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला आहे. पण हे सरकार व मुख्य सचिव अस करणार नाही याची खात्री आहे असे पवार यांनी म्हटले आहे.

तर आमदार रोहित पवार यांनी दुस-या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. ठाकरे सरकारला सरकारला बदनाम करण्यासाठीच फोन टॅपिंगचे षडयंत्र रचले होते की काय अशी शंका या अहवालावरून येत आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणे देखील अवघड होईल असे त्यांनी म्हटले आहे.