देवेंद्रजी, आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात, कारण…; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेनं कोकणाला भरभरून दिलं परंतु कोकणाला या सरकारनं काय दिलं ? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबिन, कपाशी संपूर्ण नष्ट झालं आहे. परंतु सरकार दिसतंय कुठे ? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. पण आता येत्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा ही अपेक्षा.” असंही रोहित पवार म्हणाले आहेत आणि त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
'राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला' असं म्हणताना @Dev_Fadnavis साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात…
कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय…
पण आता येत्या #GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा.— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2020
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरून चौफेर टीका केली. ते म्हणाले, “शिवसेनेनं कोकणाला भरभरून दिलं परंतु कोकणाला या सरकारनं काय दिलं ? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबिन, कपाशी संपूर्ण नष्ट झालं आहे. परंतु सरकार दिसतंय कुठे ? पिकेल ते विकेल काय करता ? मागच्या वर्षी पिकलं ते खरेदी केलं नाही आणि काय वल्गना करता ? आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते ते आता कुठे गायब झाले आहेत ? लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिकावं” असा टोलाही फडणवीसांनी लागवला होता.