Karachi Sweats controversy : फडणवीस म्हणाले – ‘एक दिवस कराची भारताचा भाग असेल’ तर NCP चे नेता – ‘बांगलादेशलाही विलीन करा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईस्थित कराची स्वीट्स (Karachi Sweets) च्या नावाने समोर आलेला वाद अद्यापही संपत नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कराची हे एक दिवस भारताचा भाग होईल, असा माझा विश्वास आहे. यावर महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, भाजपने जरी भारतात पाकिस्तानासह बांगलादेशलादेखील जोडत एक देश बनवला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस (एनसीपी) पक्ष त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करेल.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही ‘अखंड भारत’ वर विश्वास ठेवतो. कराची एक दिवस भारताचा भाग होईल असा आमचा विश्वास आहे.” या विधानाला उत्तर देताना मलिक म्हणाले की, फडणवीस यांनी ज्या प्रकारे कराची हा भारताचा भाग होईल असे म्हटले होते, तसे राष्ट्रवादी म्हणत आहे की भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश विलीन व्हावेत. ते म्हणाले, “जर बर्लिनच्या भिंतीला नष्ट केले जाऊ शकते तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र का येऊ शकत नाहीत, जर भाजपला या तीनही देशांचे विलिनीकरण करून एकच देश बनवायचा असेल, तर आम्ही नक्कीच त्याचे स्वागत करू.’
वास्तविक, हा संपूर्ण वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा शिवसेनेचे नेते नितीन मधुकर नांदगावकर यांनी वांद्रे येथील कराची स्वीट्स या मिठाईच्या दुकानातील मालकाला धमकी दिली होती की, त्याने दुकानाचे नाव बदलावे, कारण दुकानाचे नाव हे पाकिस्तानातील एका शहराचे नाव आहे. नांदगावकर यांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मिठाईच्या दुकानाच्या नावाचा बचाव केला होता. ते म्हणाले की, नाव बदलणे ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. ते म्हणाले की कराचीच्या बेकरी आणि कराचीची मिठाई गेली 60 वर्षे मुंबईत होती आणि त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नव्हता. ते म्हणाले की, त्यांचे नाव बदलण्यात यावे हे सांगण्याला काहीही अर्थ नाही. ते असेदेखील म्हणाले होते की, बदलाची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही.