शरद पवारांचा फडणवीसांना ‘टोला’, नागपूरमध्ये म्हणाले – ‘मी पुन्हा येईन’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या दरम्यान शरद पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी नागपूरात मी पुन्हा येईन असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. सध्या तरी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन एवढंच माझ्या डोक्यात आहे असे देखील पवार म्हणाले. तसेच पवारांनी विश्वास देखील व्यक्त केला की मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही, हे सरकार स्थापन होणार असून ते पाच वर्ष चालेल.

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करत त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारी आकडेवारी पेक्षा वास्तविक आकडेवारी जास्त असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की केंद्रकडून शेतकऱ्यांना भांडवल उभारणीची मदत होईल. राज्यात सध्या भाजपचे सरकार येईल असे भाजपचे नेते म्हणत आहे यावर तुम्ही काय म्हणालं असे पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात सध्या सुरु आहे. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्यात तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही. त्यामुळे पुन्हा आपले सरकार येईल. तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाले तरी सहा महिने देखील टिकणार नाही. यावर पवारांना विचारले असता शरद पवारांनी कोपरखळी मारली, ते म्हणाले की फडणवीस यांच्याविषयी जेवढी माहिती आहे त्यात ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत हे माहित नव्हतं.

मध्यावधी नाही, 5 वर्ष सरकार टिकेल –
शरद पवार यांनी सांगितले की मध्यावधीचा प्रश्नच नाही, सरकार स्थापन होईल आणि ते 5 वर्ष टिकेल. राज्यात स्थिर सरकार असावे आणि राज्यातील यक्षप्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी व्हावे, जे काही योग्य आहे ते करण्याची आमची इच्छा आहे.

Visit : Policenama.com