रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच भाजपच्या नेत्यांकडू महाराष्ट्राला दूषणं दिली जात आहेत. विरोधकांचा पॅटर्न सर्वांच्या लक्षात आला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूख ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचं काम विरोधकांनी बंद करावं. महाराष्ट्रात त्यांचा हा पॅटर्न कधीच यशस्वी होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बिहारच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपनं महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केल्यापासून महाराष्ट्रातील घडामोडी आणि राजकारणाची बिहारमध्ये चर्चा झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून अनेकदा यावर भाष्य केलं आहे. राज्यातील काही घटनांचा आढावा घेत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करत भाजपवर आरोप केला आहे.

रोहित पवार म्हणाले, “बिहार निवडणूक जवळ आल्यानंतरच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झालं आहे. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी भाजपनं कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, माझे अंगण माझे रणांगण अशी राज्याचा अपमान करणारी आंदोलनं केली आहेत. म्हणूनच आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठी महाराष्ट्राला दूषणं दिली जात आहेत असं दिसतंय. परंतु आपली जनता सूज्ञ आहे. विरोधकांचा पॅटर्न सर्वांच्या लक्षात आला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचं काम विरोधकांनी बंद करावं. महाराष्ट्रात त्यांचा हा पॅटर्न कधीच यशस्वी होणार नाही.” असंही ते म्हणाले आहेत.