‘फोन टॅपिंगच्या माध्यमातून हेरगिरी करणं म्हणजे चाणक्यनीती नव्हे’ : रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले असून ते म्हणाले की, नेत्यांचे फोन टॅप करण्याला चाणक्यनीती म्हणत नसतात. तसेच ते म्हणाले की, काही जणांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर केला आहे. जेव्हा जनतेचा विश्वास उडाला तेव्हा फोन टॅपिंगसारख्या गोष्टी करण्याची त्यांना गरज भासत आहे. असे रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचे फोन टॅप केले होते. यामुळे रोहित पवार यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली.

तसेच रोहित पवार म्हणाले की, राजकारण हे वेगवेगळ्या प्रकारे करतात, काही जनहिताचे निर्णय घेतात म्हणून जनता त्यांना निवडून देते. मात्र काही जण आपले वैयक्तिक हित साधण्यासाठी सत्ता स्थापित करत असतात. परिणामी अशा मंडळींचा जनाधार कमी होतो आणि मग हेच लोक निवडणूक जिंकण्यासाठी फोन टॅपिंगसारख्या पद्धतींचा अवलंब करतात. अशा प्रकारच्या राजकारणाला चाणक्यनीती म्हणत नाहीत अशी शब्दांत रोहित पवारांनी फडणवीस सरकारवर टीका केली.

रोहित पवार म्हणाले की, भाजपा लोकशाही मानत नाही ते फक्त दडपशाही मानतात. त्यामुळे या प्रकरणाला जे कोणी जबाबदार असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख लक्ष घालत आहेत, असं देखील त्यांनी सांगितलं. तसेच रोहित यांनी प्रश्न उपस्थित केला की इतक्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅप होत असतील, तर मग इतरांचं काय? तसेच भाजपा कडून सर्वसामान्य जनतेवर देखील नजर ठेवण्यात आली असावी, अशी शंका देखील यावेळी रोहित पवारांनी वर्तवली.

फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांचे फोन टॅप केले होते. तसेच विशेष करून त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज टॅप केले होते असा आरोप फडणवीस सरकारवर करण्यात आला होता. तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी देखील प्रसार माध्यमांसमोर काही आरोप केले होते. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –