शेतकऱ्यांची एवढीच काळजी असेल तर मग ‘असं’ करून विरोधी पक्षाच्या मुद्यामधील हवाच काढून घ्या ना !

पोलीसनामा ऑनलाईनः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला महिना उलटूनही सरकार तोडगा काढू न शकल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (NCP MLA Rohit Pawar) फेसबुक पेजवर लेख लिहून भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. केंद्र सरकारला देशातील शेतकऱ्यांची एवढीच जर काळजी आहे, तर या कृषी कायद्यांमध्ये हमीभावाचा उल्लेख करुन विरोधी पक्षाच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना, यासाठी विरोधी पक्षाने काही सरकारला रोखलेले नाही, असा चिमटा आ. पवार (NCP MLA Rohit Pawar)  यांनी मोदी सरकारला (Modi government)
काढला आहे.

शेतकरी आंदोलनाला तब्बल एक महिना उलटला तरी, शेतक-यांच्या मुख्य मागण्या अद्यापही केंद्र सरकारच्या लक्षात येत नाहीत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे हमीभाव! मग हमीभावाबद्दल बोलणे अपेक्षित असताना शेतकरी मालक होईल, शेतकऱ्याला माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल अशा इतर गोष्टी सांगण्यातच सरकार वेळकाढूपणा का करत आहे. पण हमीभावाबद्दल चकार शब्दही काढत नाही. विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा कांगावा सरकारकडून केला जातो पण तिन्ही कायद्यांमध्ये हमीभावाच्या संरक्षणाची एक ओळ का टाकत नाही? सरकारला शेतकऱ्यांची एवढी काळजी आहे तर या कायद्यांमध्ये हमीभावाचा उल्लेख करुन विरोधी पक्षाच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना! यासाठी विरोधी पक्षाने काही सरकारला रोखलेलं नाही”, असे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.

खोटं बोल पण रेटून बोलण्यात राज्यातील भाजप नेते पुढे : आ. पवार
कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या विधानांमध्ये एकमत नसल्याची टीका केली. राज्यात भाजपा तर रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढ गेली आहे की आपण काय बोलून जातो याचंही त्यांना भान राहत नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार नाही, असे केंद्र सरकार म्हणत आहे. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड महाराष्ट्र भाजपचे नेते करतात. एकंदरीतच सगळाच सावळा गोंधळ सुरु असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

शेतकरी हा ‘शेतकरी’ असतो
दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन हे देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याचे रोहित पवारांनी यावेळी नमूद केले. काही लोकं म्हणतात की आंदोलन करणारा शेतकरी हा फक्त उत्तर भारतातील आहे; पण मला या लोकांना सांगायचे आहे की, शेतकरी हा फक्त शेतकरी असतो. त्याला ना जात, ना धर्म, ना प्रदेश असतो. त्यामुळे शेतकऱ्यांविषयी असलेली तुमची भावना ही तुमची विचारसरणी दाखवून देत असते, अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांना अधिक मदत केल्याचा दावा
राज्यात भाजप सरकार असतानाच्या काळापेक्षा गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने अधिक प्राधान्याने शेतकऱ्यांना मदत केल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसल्याचा निराधार आरोप विरोधी पक्ष नेहमी करत असतो. याबाबत बघितल तर गेल्या पाच वर्षात मागील सरकारने शेतकऱ्यांना जवळपास 53 हजार कोटींची मदत केली होती. तर महाविकास आघाडी सरकारने अवघ्या एका वर्षात शेतकऱ्यांना जवळपास 37 हजार कोटीची मदत केल्याचे पवार यांनी सांगितले.