‘महाराष्ट्राला ‘अशांत’ करू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत मोर्चा काढला. यावेळी त्यांनी सीएए आणि एनआरसी कायद्यावरून मोर्चा काढणाऱ्यांना दगडाने नाहीतर तलवारीने उत्तर देण्यात येईल अशी धमकी दिली. त्यांच्या विधानाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांना फटकारले आहे.

दगडाला दगडाने आणि तलवारीने उत्तर देऊ असं कोणी बोलत असेल तर हे कायद्याचे राज्य आहे. शांतीप्रिय लोक या राज्यात राहतात. हिंसा करण्याची भाषा असेल तर आम्ही गांधीवादी असून हे राज्यात खपवून घेणार नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांना सुनावले आहे. तसेच प्रत्येक पक्षाला स्वत:ची भूमिका स्विकारण्याचा अधिकार आहे. आता काही पक्ष मोर्चे काढत आहेत. पण त्यांच्यामागे कुणी तरी आहे. त्यांच्यामागे कुणीही असलं तरी या राज्याला काहीही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली.

जे लोक सीएए आणि एनआरसी समजत नाही म्हणून मोर्चे काढत आहेत, त्यांनाच सीएए आणि एनआरसीबद्दल कळत नाही. भारत हा धर्मशाळा झाली आहे. सीएएचा कायदा केल्यानंतर धर्मशाळेत रुपांतर झालं आहे. भारतात दोन कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत असे भाजपचे लोक आसाममध्ये पण सांगत होते. आकडे समोर आले तेव्हा सोळा लाख मुस्लीम आणि तीन लाख हिंदू असल्याचे समोर आले होते. उगाच आकडे काही फेकण्याची गरज नाही, असा टोला मलिक यांनी लगावला.