रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले – ‘निवडणुका खिलाडूवृत्तीने लढवाव्या, यंत्रणांचा गैरवापर चुकीचा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील 5 राज्यांत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून प्रचारसभांना वेग आला आहे. निवडणुका होत असलेल्या या राज्यात ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांसारख्या केंद्रीय संस्था सक्रिय झाल्याचे बंगाल आणि तमिळनाडू निवडणुकीत दिसून आले आहे. तसेच आसामच्या राताबरीमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडण्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुका या एखाद्या खेळासारख्या असतात. त्या तशाच खिलाडूवृत्तीने लढवायच्या असतात. पण यामध्ये दडपशाही आणि यंत्रणांचा गैरवापर झाला तर ती लोकशाही राहत नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांचाही खेळ होऊ शकतो. हे टाळण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.

आमदार रोहीत पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आसामच्या राताबरीमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडण्याची घटना धक्कादायक आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने सामान्य मतदारांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण होत आहे. सध्या आसामबरोबर तमिळनाडूही निवडणूका होत आहेत. तामिळनाडूत डी.एम.के पक्ष प्रमुख एम. के स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर ऐन निवडणुकीत छापे मारण्याची घटना शंका उपस्थित करणारी आहे. केवळ निवडणूकीच्या तोंडावर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा डाव असून हे थांबणे गरजेचे आहे. केवळ एखादी निवडणूक जिंकण्यासाठी देशाच्या लोकशाहीला आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेलाच गुंडाळून ठेवणे कितपत योग्य आहे, अशी विचारणा पवारांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकट्या ममता बॅनर्जींच्या विरोधात एक मोठी शक्ती साम, दाम, दंड, भेद आणि सत्ता याचा वापर करताना दिसत आहे. येथील सत्ता कुणाला मिळेल याचा योग्य निर्णय ही बंगाली जनता घेईलच, पण निवडणुका या कुणाच्या दबावाखाली होता कामा नये, याची काळजी निष्पक्ष आणि स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगानेही घेणे गरजेचे असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.