‘NCP काँग्रेस पक्षाला वाळवी सारखं पोखरतोय’, पदाधिकार्‍यानं गंभीर आरोप करत केलं ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कॉंग्रेसला महाविकास आघाडी सरकारमध्ये एकट पाडले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षच सध्या सरकार चालवण्याचे काम करत आहेत. सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विश्वबंधू राय ( Mumbai Congress General Secretary Vishwabandhu Rai) यांनी थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी ( Congress Party President Sonia Gandhi) यांना याबाबत सविस्तर पत्र लिहिले आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपाने सत्तेत आहेत. मात्र, यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यामुळे सरकार किती काळ टिकेल याबाबत वारंवार चर्चा झडत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांमधली धुसफूस समोर आली आहे.

ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना पक्षासाठी तळागळातील लोकांपर्यंत काम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच त्यांच्या मंत्र्यांकडे कुठलं खात आहे, हे माहिती नाही. आपल्यासोबत युतीत असलेले पक्ष हे स्वतःच्या पक्षातच मग्न असून वैचारिक रणनीती आखत आपल्या पक्षाला नाराज करत आहेत. हे थांबवण्यात काँग्रेस पक्ष कुचकामी ठरला आहे, असेही राय यांनी पत्रात म्हटले आहे.

राय याने हा देखील आरोप केला आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये कोणतीही कामं झालेली नाहीत. त्याचबरोबर पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी काही ठोस पावल उचलणे गरजेचे आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युतीधर्म पाळण्याच्या सूचना देणे हे देखील गरजेचे असल्याचे पत्रात नमूद केले आहे. मुंबई मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे.