माळेगावकरांनी दिला अखेर अजित पवारांना ‘कौल’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण बारामतीत ग्रामपंचायतीपासून सर्व साखर कारखान्यावर आपला झेंडा रोवला तरी माळेगाव साखर कारखान्यावर मात्र, अजित पवार यांना वर्चस्व राखणे शक्य झाले नव्हते. यंदा मात्र माळेगावकरांनी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळंकठेश्वर पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर यश मिळवून माळेगाव साखर कारखान्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत. चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे मात्र संचालक म्हणून कारखान्यावर निवडून आले आहेत. राखीव ५ जागांवरील मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरु होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. चंद्रराव तावरे हे शरद पवार यांचे समर्थक होते. मात्र, अजित पवार यांच्याकडे बारामतीची सुत्रे गेल्यानंतर त्यांच्याशी तावरे जुळवून घेऊ शकले नाही. २०१४ मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर २०१५ मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यामुळे आता राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर कारखान्यावरही वर्चस्व मिळविण्यासाठी अजित पवार यांनी आपली ताकद लावली होती. त्यांनी माळेगाव कारखान्याच्या परिसरात ४ सभाही घेतल्या होत्या.

रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी अनेक आक्षेप घेतले गेल्याने प्रत्यक्ष मतमोजणी दुपारनंतर सुरु झाली. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या १८जागांपैकी १३ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलने कारखान्यावरील सत्ता खेचून आणली आहे.