‘महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल’ : नरेंद्र मोदी

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर सडकून टीका केली. इतकेच नाही तर, आता घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलल्याचेही म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या गोंदिया येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. राज्यातील ही त्यांची दुसरी सभा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना मराठीत भाषणाला सुरुवात केली. भाषणाला सुरुवात करताच मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर टीका केली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, “महायुती महारष्ट्रातील महामिलावट साफ करेल. आता घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला आहे.” असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, “काँग्रेसला केवळ दोनच कामं येतात. एक तर कब्जा करणे किंवा मग संभ्रमावस्था निर्माण करणं. कब्जा करणे जमत नाही त्यामुळे आता काँग्रेस संभ्रमावस्था निर्माण करत आहे.”

‘नक्षलवादाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा’

यावेळी मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला ढकोसलापत्र म्हणत त्यातील देशद्रोहाचे कलम रद्द करण्याबाबतच्या आश्वासनावर मोदींनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “काँग्रेसचा जाहीरनामा हा जवानांचा अपमान आहे. शहरी नक्षलवादाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे म्हणूनच त्यांनी हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या योजनांचा कट आहे.” असा घणाघातही मोदींनी केला आहे.