रेल्वेच्या विशेष गाड्यांमध्ये पुणे-मुंबईकडे ‘दुर्लक्ष’, प्रवाशांची निराशा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, अनलॉकमध्ये काही विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशभरात 80 विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या यादीत मुंबई – पुणे मार्गावर इंटरसिटी गाड्यांकडे कानाडोळा करण्यात आल्याने प्रवाशांची निराशा झाली आहे. प्रवाशांकडून पुणे-मुंबई मार्गावर रेल्वे सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातून केवळ मुंबई-मनमाड, परभणी-हैदराबाद आणि सोलापूर-म्हैसूर या तीनच गाड्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे. कोरोना मुळे देशात बंद असलेली रेल्वे सेवा 1 जूनपासून सुरु करण्यात आली. देशभरात 230 विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या. यामध्ये पुण्याच्या वाट्याला पुणे-दानापुर एक्सप्रस ही एकमेव गाडी आली. तर मुंबईतून धावणाऱ्या तीन आणि गोवा एक्सप्रेस या गाड्या पुणेमार्गे धावत आहेत.

पुण्यातून मुंबईला दररोज हजारो प्रवासी जातात. सध्या शिवनेरी बससेवा सुरु केली असली तरी तिकीट दर परवडत नसल्याने प्रवाशांनी खासगी वाहनांना पसंती दिली आहे. राज्यात आता आंतरजिल्हा प्रवासावरील बंदीही उठवण्यात आली आहे. रेल्वेतूनही आंतरजिल्हा तिकीट उपलब्ध होत आहे. त्यामुळे एखादी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे मंत्रालयाने 80 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पुण्याला एखादी गाडी मिळेल अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र रेल्वे मंत्रालयाने पुणेकरांची घोर निराशा केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने नवीन 80 विशेष गाड्यांमध्ये मुंबई-मनमाड एक्सप्रेस, सोलापूर-म्हैसुर एक्सप्रेस आणि परभणी-हैदराबाद एक्सप्रेस या तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. तीनही गाड्या दररोज धावणार आहेत. सध्या पुण्याहून मराठवाडा, विदर्भात जाण्यासाठी एकही रेल्व गाडी उपलब्ध नाही. तसेच एसटीने मर्यादीत स्वरुपात बससेवा सुरु केल्याने अनेक प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात जाण्यासाठी एकही रेल्वे गाडी नसल्याने या प्रवाशांमध्ये नाराजी आहे.