नेहरूंना कमीपणा दाखवण्यासाठी पटेलांचा पुतळा उभारला नाही : पंतप्रधान

अमरेली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कमीपणा आणण्यासाठी उभारलेला नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. अमरेली तेथे मोदींची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

सरदार पटेल हे काँग्रेसचे नेते होते. मात्र आजवर एकाही काँग्रेस नेत्याने या पुतळ्याला भेट दिलेली नाही. सरदार पटेल यांचे कर्तृत्वच एवढे महान आहे की त्यांच्यापुढे इतरांना खुजे दाखविण्याचे काहीच कारण नाही, असं त्यांनी म्हटलं.

देशातील दहशदवादी कारवायांवरही त्यांनी यावेळी वक्तव्य केले. केंद्र सरकारने केलेल्या कठोर कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमधील दोन-अडीच जिल्ह्यांपर्यंतच आता दहशतवादी कारवाया मर्यादित राहिल्या आहेत. याआधी पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, काशी, जम्मू अशा अनेक ठिकाणी अधूनमधून बॉम्बस्फोट झाल्याचे ऐकण्यात येत असे. पण गेल्या पाच वर्षांत देशात कुठेही बॉम्बस्फोट घडलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरचा प्रश्न चिघळला. जम्मू-काश्मीरमधील काही भाग वगळला, तर त्या राज्याच्या अन्य भागात शांतता आहे. मुंबईवर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काँग्रेस केंद्रात सत्तेवर होती. त्या हल्ल्याला काँग्रेसने चोख दिले नाही. आमच्या राजवटीत मात्र सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला, असंही त्यांनी म्हटलं.