‘भारतातील आयोध्या बनावट, खरी आयोध्या नेपाळमध्ये, प्रभू राम भारतीय नव्हते, ते तर नेपाळी’ : नेपाळचे पंतप्रधान ओली

काठमांडू : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारताविरोधी भूमिका घेणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना खुर्ची जाण्याची भीती असताना त्यांनी आता ते भारतावर निशाणा साधला आहे. भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट आयोध्या निर्माण केली. खरीखुरी आयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी होते, असा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला पंतप्रधान पदावरून दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा अडचणीत साडपले आहेत. त्यांचे पंतप्रधानपद धोक्यात आहे. ते टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी थेट भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळवर सांस्कृतीक अत्याचार करण्यात आले. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आली, असं ओली कवी भानुभक्त आचार्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी राम भारतीय नव्हते तर ते नेपाळी होते असे वक्तव्य केलं आहे.

केपी शर्मा म्हणाले की, राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली, असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. आयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतातील अयोध्या खरीखुरी नाही असा दावा त्यांनी केला आहे. भारतातील अयोध्या खरी असेल तर मग तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढेच नाही तर त्यांनी विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्येच झाल्याचा दावाही केला.