एवढाच ‘जोश’ असेल तर सिमेवर जा : वीरपत्नी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील जनता द्वीधा मनःस्थीतीत आहे. कारण देशात एकीकडे विरमरण आलेले वैमानिक निनाद मांडवगणे यांचे अंतिमसंस्कार करण्यात येत आहेत. तर एकीकडे भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची भारतात वापसी होत आहे. त्यामुळे आनंद व्यक्त करायचा की दुखः व्यक्त करावं हे समजत नाही. त्यात सोशल मीडियावर सर्व आपल्या भावना व्यक्त करत असतात. या नेटकऱ्यांना बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले वैमानिक निनाद यांच्या पत्नीने आवाहन केले आहे.

आज आमच्या घरातील सैनिकाला वीरमरण आले. उद्या दुसऱ्या कोणा सैनिकाला वीरगती प्राप्त होईल; पण माझी एक देशवासियांना विनंती आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर युद्धाच्या गप्पा थांबवा, अशी साद त्यांच्या पत्नीने नेटकऱ्यांना घातली आहे. युद्ध हे कोणाच्याही हिताचे नाही. सैन्य सक्षम आहे, त्यांना सल्ले देणे योग्य नाही, असे मी समजते. कारण कृपा करून अशा पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा, असं आवाहन त्यांनी केले आहे.

जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या. आम्हाला युद्ध नकोय, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे. निनाद हा माझे जीवन होता आणि आहे. तो जरी शहीद झाला असला तरी तो आजही आमच्यात आहे, माझ्या तनामनात आहे. निनाद सारखा पती कधीच मिळणार नाही,  मी त्याला कधीही विसरू शकत नाही, असं म्हणत त्यांनी निनाद यांच्याबद्दल असलेले प्रेमही व्यक्त केले.

दरम्यान, बडगाम येथे लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे यांना वीरमरण आले. निनाद हे फक्त ३३ वर्षांचे होते. ते मुळचे नाशिक होते.