निर्भया केस ! 3 मार्च रोजीच होणार ‘फाशी’, SC मध्ये प्रलंबित याचिकेमुळं ‘डेथ वारंट’वर ‘परिणाम’ नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणी येत्या 3 मार्चला दोषींना देण्यात येणार्‍या फाशीच्या दिल्लीच्या तिहार कारागृहात तयारीला वेग आला आहे. फाशीची फायनल ट्रायल घेण्यासाठी यूपीच्या मेरठहून जल्लाद पवन हे कधीही दिल्लीतील तिहार कारागृहात पोहचू शकतात.

प्रलंबित याचिकेमुळे डेथ वॉरंटवर परिणाम नाही
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून सर्व दोषींना एकाचवेळी फाशी देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊन ठेवले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, ज्या दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत, त्यांना फाशी देण्याची परवानगी देण्यात यावी. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट केले होते की, ही याचिका प्रलंबित असल्याने खालच्या न्यायालयाने दोषींविरूद्ध जारी केलेल्या डेथ वॉरंटवर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 5 मार्चपर्यंत सुनावणी टाळली होती.

वेगवेगळ्या सेलमध्ये सर्व दोषी
दरम्यान, स्थिती पाहून तिहार कारागृह प्रशासनाने कारागृह क्रमांक-3 मध्ये चारही दोषी (पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह) यांना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवले आहे, यामुळे त्यांना फाशीच्या तयारीची माहिती मिळणार नाही.

दोरखंडाला लावले जात आहे बटर
3 मार्चला दोषींना फाशी दिली जाणार असल्याने कारागृहात ठेवलेल्या दोरखंडाला सतत बटर लावून नरम केले जात आहे. यामुळे फाशीदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

एक मार्चपर्यंत पोहचणार जल्लाद
तिहार जेल प्रशासनानुसार फाशीच्या किमान दोन दिवस अगोदर उत्तर प्रदेशच्या मेरठमधून जल्लाद पवन येथे पोहचणार आहे. याबाबत तिहार कारागृह प्रशासनाने अगोदरच युपी सरकारशी चर्चा केली आहे.

जल्लाद पवनला मिळणार 60,000 रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, तिहार कारागृह प्रशासन सर्व दोषींच्या फाशीसाठी जल्लाद पवनला 60,000 रुपये देणार आहे. म्हणजे प्रत्येक फाशीचे 15,000 रुपये दिले जाणार आहेत. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

फाशीच्या तारखेच्या चार दिवस आधी निर्भयाचा दोषी पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका दाखल करून मृत्युदंडाला आव्हान दिले आहे. याचिकेत पवनने 3 मार्चला होणारी फाशी रोखण्याची मागणी केली आहे.

पवनकडे अजूनही आहेत पर्याय
पवनचे वकिल एपी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव याचिका दाखल केल्याची माहिती देताना सांगितले की, अजून पवनचे सर्व कायदेशीर पर्याय संपलेले नाहीत. यचिकेत फाशीचे रूपांतर जन्मठेपेत करण्याच्या मागणीसह म्हटले आहे की, पवन गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन होता, यावर विचार झाला पाहिजे. सिंह यांनी हेदखील म्हटले की, गुन्हा घडला तेव्हा पवन घटनास्थळी हजर नव्हता.

निर्भयाच्या चारही दोषींपैकी पवन एकमात्र असा दोषी आहे, ज्याने अजूनपर्यंत क्यूरेटिव्ह आणि दया याचिका दाखल केली नव्हती. याशिवाय, बाकीच्या अन्य तीन दोषींचे सर्व पर्याय संपले आहेत.

3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी
उच्च न्यायालयाने सर्व दोषींना सोबतच फाशी देण्याच्या आदेशात दोषींना कायदेशीर पर्याय निवडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला होता. आणि सात दिवसांची वेळ संपल्यानंतर खालच्या न्यायालयाने चारही दोषी मुकेश, अक्षय, विनय आणि पवन यांना फाशी देण्यासाठी 3 मार्चसकाळी 6 वाजताचा ब्लॅक वॉरंट जारी केला आहे.