२०० आणि ५०० रुपयांच्या नवीन नोटांबाबत आरबीआयची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ५० रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता आरबीआयने ५०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची घोषणा केली आहे. यासंबंधीची माहिती भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या नोटेवर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही आहे.

२०० व ५०० रुपयांच्या नवीन नोटा ह्या जुन्या नोटांप्रमाणेच असणार आहेत. या नवीन नोटा चलनात येणार असल्या तरी, चलनात असलेल्या जुन्या नोटांना कोणताही धोका नाही. नव्या नोटेसोबत जुन्या नोटाही पूर्ववतपणे चलनात राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. या नोटांवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे.

नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. तर रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वप्रथम,५०० आणि २ हजारांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. त्यानंतर २०० रुपयांची , ५० रुपयांची १० रुपयांची आणि आता १०० रुपयांची नवीन नोट बाजारात आली आहे. त्यानंतर पुन्हा ५० रुपयांचीही नवी नोट चलनात आणली असून आता २०० व ५०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार आहेत. २०१६ च्या आरबीआयच्या वार्षिक अहवालातच या नोटांमध्ये होणाऱ्या बदलाचे संकेत देण्यात आले होते.