पाण्याच्या बाटल्यांची चव बदलणार, 1 जानेवारीपासून लागू होणार नवा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणने (Food Safety Standards Authority of India) (FSSAI) पाण्याच्या बाटल्यांसाठी नव्या गाइडलाइन्स (Guidelines) तयार केल्या आहेत. यामुळे सर्व पॅकेज्ड पाणी तयार करण्याची पद्धत बदलणार आहे. त्यामुळे आता 1 जानेवारी 2021 पासून पाण्याच्या बाटल्यांची चव बदलणार आहे. भारतीय बाजारपेठेतील पॅकेज्ड वाॅटरच्या उद्योगातील काही कंपन्यांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे.

इंग्रजी वेबसाईट moneycontrol.com ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, FSSAI च्या नव्या गाइडलाइननंतर पॅकेज्ड पाणी (Packaged water) तयार करणाऱ्या कंपन्यांना एक लिटर पाण्याच्या बाटलीत 20 मिलिग्रॅम (mg) कॅल्शियम आणि 10 मिलिग्रॅम मॅग्नेशियम एकत्र करावे लागणार आहे.

मिनरल्स चवीसाठी अधिक चांगले असल्याचे मानले जाते. यामुळे नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) ने FSSAI ला पॅकेजिंग पाण्यात काही विशेष मिनरल्स अ‍ॅड करण्याची शक्यता शोधण्यास सांगितले होते. NGT ने म्हटले आहे, की पाणी सुरक्षित करण्यासाठी, फिल्टरच्या प्रक्रियेत मिनरल्स काढणे आवश्यक असते. ते ग्राहकांच्या फायद्यासाठी पुन्हा टाकावेत.

NGT ने 29 मे 2019 रोजीच हा आदेश दिला होता. हा आदेश लागू करण्यासाठी कंपन्यांना दोन वेळा वेळ दिला होता. मात्र, आता हा आदेश लागू करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2020 ची डेडलाइन निश्चित केली आहे. सरकारने दिलेल्या या डेडलाइनमुळे आता हा नियम 1 जानेवारी 2021पासून लागू होईल. यासाठी FSSAI ने आधीच नव्या पद्धतीने प्राॅडक्ट्स तयार करण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. तसेच यानंतर पॅकेज्ड वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यांना आणखी वेळ दिला जाणार नसल्याचे NGT ने स्पष्ट केले आहे.

भारतीय बाजारात सध्या Kinley, Bailey, Aquafina, Oxyrich, Vedica आणि Tata Water Plus हे पॅकेज्ड वाॅटरच्या उद्योगात असून त्यांनी नव्या नियमाप्रमाणे पाणी तयार करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. या सर्व कंपन्या आपल्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये निर्धारित प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र करत आहेत. भारतातील पॅकेज्ड पाण्याचा उद्योग 3000 कोटी रुपयांचा आहे. कंपनी 500 ml, 250 ml, 1 लिटर, 15-20 लिटरच्या बाटल्या विकल्या जातात.