दुर्देवी ! बसचा भीषण अपघात झाल्यानं 9 प्रवाशांचा जागीच ‘कोळसा’

ब्रह्मपूर : वृत्तसंस्था – बसचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने बसमधील 9 प्रवाशांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ओडिशामधील गंजाम जिल्ह्यातील गोलंतारमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये बसमधील इतर 22 प्रवासी जखमी झाले असून यामधील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलपडु इथून चिकरादा येथे एक खासगी बस जात होती. त्यावेळी रस्त्यामध्ये अचानक 11 किलो वॅटच्या ट्रान्समिशन लाइनचा स्पर्श बसला झाला. त्यामुळे विजेचा प्रवाह बसमध्ये उतरल्याने बसमधील प्रवाशांना विजेचा शॉक बसला. यामध्ये 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 22 प्रवासी जखमी झाले. बसमधील सर्व प्रवासी हे जवळील येथील एका लग्न समारंभासाठी जात होते.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचरण केले. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना ब्रह्मपूरमधील एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजेचा शॉक बसल्यानंतर बसने पेट घतेला. आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. दरम्यान वीज प्रवाह थांबवून बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत मृत झालेल्या प्रवाशांच्या नातेवईकांना दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर जखमी प्रवाशांवर सरकरकडून उपचार केले जाणार असून उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा केली. परिवहन मंत्री पद्मनाभ बेहरा यांनी या दुर्घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.