दहावीचा निकाल कमी लागल्याने शिक्षकांना ‘असा’ बसणार ‘फटका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. तोंडी परिक्षा बंद केल्याने विद्यार्थांच्या नापासाचे प्रमाण वाढले तसेच त्यांची टक्केवारी कमी झाली. विद्यार्थ्यांना जसा हा फटका बसला आहे, तसाच तो आता शिक्षकांनाही बसणार आहे. विशेषत: मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. २०१८-१९ च्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी सरकारकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मात्र, जो शिक्षक किंवा मुख्याध्यापक यासाठी अर्ज करणार आहे, त्याच्या विषयाचा किंवा शाळेचा निकाल १०० टक्के असणे आवश्यक असल्याचा नियम यासाठी लागू आहे. त्यामुळे अनेक शिक्षक, मुख्याध्यापक यांना त्याचा फटका बसून ते या स्पर्धेतून बाद होणार आहेत.

यंदा ११ लाख ९३ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मराठीची परीक्षा दिली. यापैकी तब्बल २ लाख ५७ हजार ६२७ म्हणजेच २१.५८ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. राज्य शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षक ज्या वर्गाला शिकवतो किंवा जो विषय शिकवितो त्याचा १०० टक्के निकाल नसल्यास त्याचा या पुरस्कारासाठी विचारही केला जाणार नाही.