‘त्यांच्या’ हिशोबाला आम्ही तयार : आ. संग्राम जगताप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील मोदी लाट व धनशक्तीचा वापर यामुळेच भाजपाचा विजय झाला. काम न करणा-यांचा आणि विरोधकांचा आगामी तीन महिन्यांत हिशोब करु म्हणणा-यांच्या हिशोबाला आम्ही तयार आहोत, असे प्रत्युत्तर आ. संग्राम जगताप यांनी डॉ. सुजय विखे यांना आज पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

जगताप म्हणाले की, कालपासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत आम्ही प्रचार केला. त्या तुलनेत मला मिळालेली मते महत्वाची आहेत. त्याबद्दल मतदार आणि दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत.

डॉ. विखे यांचा विजय मोदींचा चेहरा आणि धनशक्तीमुळे मिळालेला आहे. विधानसभेसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहोत, मात्र पक्षांतर करण्याचा कोणताही विचार आपल्या मनात नाही, असेही जगताप म्हणाले.