पोलिस निरीक्षकाने 5 लाखाची मागणी करत ‘खोट्या’ गुन्ह्यात गोवलं, पोलिस अधीक्षकांकडे लेखी ‘तक्रार’, पोलिस दलात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी गुन्हा दाखल करू नये, यासाठी पाच लाख रुपये मागून 25 हजार काढून घेतले. तसेच पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. जातीवाचक शिवीगाळ केली. मागितलेले पैसे न दिल्याने न्यायालयाचा अवमान करून खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार बाळासाहेब पोपट माळी यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे केली आहे. या तक्रार अर्जामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील 18 एकर शेतजमिनीबाबत न्यायालयात दावा सुरू असताना व न्यायालयीन स्थगिती असताना रोहिदास भास्कर देशमुख याने पोलिसांत बाळासाहेब माळी व इतर चार जणांविरूध्द खोटी तक्रार दिली. देशमुख याला या मिळकत क्षेत्रात न्यायालयाने निरंतर मनाई केलेली असताना न्यायालयाचा अवमान करून तक्रार दिली.

याप्रकरणी माळी यांना पोलिसांनी बोलावून खंडणी व दरोड्याच्या गुन्ह्यात पत्नी व मुलांना अटक करण्याची धमकी देऊन कारवाई टाळण्यासाठी 5 लाख रूपयांची मागणी केली. गुन्हा दाखल होण्याअगोदर
पोलिसांनी माळी यांच्या खिशातील 25 हजार रूपये काढून घेऊन दोन दिवस पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. जाणीवपूर्वक अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. या खोट्या गुन्ह्यात फिर्यादीबरोबर तडजोड करून देतो मी मध्यस्थी करतो, असे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यास गावातून धिंड काढेन अशी धमकी दिली, असे निवेदनात म्हटले आहे.

न्यायप्रविष्ठ दिवाणी बाबींमध्ये न्यायालयाची निरंतर स्थगिती असताना व तक्रारदार देशमुख यास जमिनीत येण्यास बंदी असताना न्यायालयाचा अवमान करून खंडणी व दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला. जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या पोलिस निरीक्षक पोवार यांच्यावर कारवाई करून विभागीय चौकशीची मागणी
माळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या तक्रार अर्जाची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याचे समजते.

आरोग्यविषयक वृत्त –