‘शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला’ : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मनसेवर आणि काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला. अश्या शब्दात आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, दादरमधील शिवाजी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड आले होते. त्यावेळी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मनसैनिकांसह सहभागी झाले. इतकेच नव्हे तर, काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यात गळाभेटही झाली.

एकनाथ गायकवाड आणि संदीप देशपांडे यांच्यात झालेल्या भेटीला भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून टीकास्त्र सोडले. ‘शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला. गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला. पण उपयोग काय ? शुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय, बाकी शुन्यच ! नाही आले “एकनाथराव” भेटीला तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला ?’ अश्या शब्दात आशिष शेलार यांनी ट्विट करून टीका केली.