संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य सल्ला द्या : विभागीय आयुक्त राजाराम माने

विभागीय आयुक्‍त राजाराम माने यांनी घेतली आढाबा बैठक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – जिल्‍हयात कमी पर्जन्‍यमान व पावसातील खंड यामुळे शेतकरी हा सध्या अडचणीत सापडला असून शेतकऱ्याला शेती कशी फायदेशीर ठरेल याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सल्ला शेती विभागाने द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्‍या खरीप हंगाम पूर्व आढावा व सन 2019-20 नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील,जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी,विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

श्री माने म्‍हणाले,शेतकऱ्याला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई आहे. त्यामुळे खरिपाचे नियोजन करताना त्याला काय आवश्यक आहे,याचे नियोजन करण्याची गरज आहे.

मागील काळाचा विचार करता औषध कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. आहे. हे लक्षात घेऊन सर्व औषध कंपन्यांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश त्यांऩी दिले. कापूस पीक हे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. यावर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती दक्षता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना बँकेने पीकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधितांवर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिक गतीने होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्‍हाधिकारी श्री.द्विवेदी म्हणाले, जिल्‍हयातील जलयुक्‍तसाठी 249 गावांची निवड झाली प्रस्‍तावित कामांची संख्‍या 6 हजार 368 पैकी 2 हजार 404 कामे पूर्ण झालेली असून उर्वरित 3 हजार 964 जलयुक्तची कामे प्रगतीत आहेत. या कामांचे सर्व संबंधित ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेली आहेत. सर्व कामे लवकर पूर्ण करण्‍यात यावीत. माहे मे 2019 च्‍या शेवटच्‍या आवठवडयात जलयुक्‍त कामांचा आढावा घेण्‍यात येणार आहे. ज्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे यावेळी सांगितले.

प्रस्‍ताविकात श्री नलगे म्‍हणाले, अहमदनगर जिल्‍हयात 14 तालुक्‍यांचा समावेश असून जिल्‍हयामध्‍ये 1हजार 602 गावे आहेत. यापैकी खरीप हंगामाची 582गावे तर रब्‍बी हंगामाची 1 हजार 20 गावे आहेत. जिल्‍याचे एकूण भौगालिक क्षेत्र 17.02 लाख हेक्‍टर आहे. जिल्‍हयात खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 4.79लाख आहेत. खरीप हंगाम 2019 साठी 6.65 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्‍ट ठेवणेत आले असून ते सरासरीच्‍या क्षेत्राच्‍या 125.70 टके इतके आहे. प्रामुख्‍याने2.29 लाख हेक्‍टर क्षेत्रावर तृणधान्‍य, 1.01 लाख हेक्‍टर क्षेत्रावर कडधान्‍य, 0.95 लाख हेक्‍टर क्षेत्रावर गळीत धान्‍य पिकाचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात आले आहे. त्‍याच बरोबर कापूर पिकाचे 1.30 लाख हेक्‍टर क्षेत्राचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात आले आहे.