कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण, निर्यातबंदी हटविण्याची जोरदार मागणी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – लासलगाव बाजार समितीत गुरुवारच्या तुलनेत आज सोमवारी एक हजार रुपयाची मोठी घसरण कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल मागे होत कांद्याचे बाजार भाव तीन हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कांद्याच्या बाजार भावातील घसरण रोखण्यासाठी कांद्याची निर्यात खुली करत सर्वच निर्बंध कांद्यावरील हटवण्याची मागणी सर्वच घटकाकडून जोरदार केली जात आहे.

अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे लाल कांद्याची आवक मंदावल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने कांद्याचे बाजार भाव 17 डिसेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत 11 हजार 111 रुपये इतक्या प्रतिक्विंटल ला उच्चांकी बाजारभाव मिळाल्याची ऐतिहासिक नोंद झाली होती. त्यानंतर देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये दररोज कांद्याची आवक वाढत असल्याने आज दीड महिन्यात कांद्याच्या बाजारभावात 80% घसरण झाली असून कांद्याचे बाजारभाव हे तीन हजार रुपयांच्या आता आले असून गुरुवारच्या तुलनेत आज सोमवारी एक हजार रुपयाची मोठी घसरण होत आज सोमवारी लासलगाव बाजार समितीत 20 हजार क्विंटलची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती. त्याला जास्तीत जास्त 2851 रुपये, सरासरी 2300 रुपये तर कमीतकमी 1000 रुपये इतका प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला आहे. दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने ही घसरण रोखण्यासाठी कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी शेतकरी वर्गा कडून केली जात आहे.

अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र उत्पादनाच्या तुलनेत आज मिळणाऱ्या बाजारभावातून खर्चही भरून निघणार नसल्याने कांद्यावरील सर्व निर्बंध हटवत कांद्याच्या बाजार भावातील घसरण रोखण्यासाठी निर्यात खुली करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी गणेश कांदे यांच्यासह कांदा उत्पादक करत आहे.

देशांतर्गत मागणी त्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नाही. त्यावेळी कांद्यावरुन निर्बंध लादणे कांद्याची निर्यातबंदी करणे आणि शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांद्याचे बाजारभाव कमी असताना कांदा खरेदी करून तो पुरविणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र कांद्याच्या बाजारभावात घसरण होते त्यावेळेस तुटपुंजी मदत दिली जाते तीही फार आरडाओरडा केल्यानंतर दिली जात असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करत आहे. कांद्याला हमीभाव दिलाच पाहिजे कांद्याची निर्यात बंदी खुली केली झालीच पाहिजे. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी कांतीलाल नागरे यांनी केली आहे.