तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आचारसंहितेनुसार चौदा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ६ वाजता थंडावल्या आहेत. मतदानापूर्वी ४८ तास आधी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना जाहीर प्रचार, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचार करता येणार नाही तसेच चलचित्र, बल्क एसएमएस व अन्य तत्सम साधनांच्या सहाय्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करता येणार नाही.

राज्यातील तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान होत आहे. काही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार असून याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. माढा, सातारा, अहमदनगर आणि बारामती या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.

प्रचार कालावधी समाप्त झाल्यानंतर मतदारसंघात प्रचारासाठी मतदारसंघाच्या बाहेरुन आलेले आहेत आणि जे मतदारसंघाचे मतदार नाहीत अशा राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचार मोहिमेतील कार्यकर्ते यांना मतदारसंघात उपस्थित राहता येणार नाही.