विधानसभेत पुन्हा एकदा ‘गदारोळ’, उद्यापर्यंत कामकाज ‘तहकूब’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आज (17 डिसेंबर) नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. यावेळी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुकी झाल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेचे नेते संजय गायकवाड आणि भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्यात विधासभेतच जुंपली. संजय आणि अभिमन्यू यांच्यात धक्काबुक्की झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी विधानसभेच कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. यानंतर विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

आज सकाळी विधानसभेत जेव्हा कामकाज सुरू झालं यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रस्ताव मांडला. 25 हजारांची मदत अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना करायची आहे ती करण्यासाठीच त्यांनी मागणी केली. अशातच विरोधकांकडून बॅनरही फडकवण्यात आले. हे बॅनर खाली खेचण्यासाठी शिवसेनेचे आमदार पुढे सरसावले. यात बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हातातला बॅनर खाली खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी या दोन्ही आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. बघता बघता दोन्ही पक्षाचे आमदार आमने-सामने आले. दरम्यान दोन्ही पक्षात जवळपास हाणामारी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

यानंतर ज्येष्ठ आमदार धावून आले आणि त्यांनी मध्यस्थी केली. दोन्ही पक्षांच्या आमदारांना बाजूला करण्यात आलं. दोन्ही पक्षांच्या आमदारात एक संताप पहायला मिळाला. यानंतर विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं होतं. अर्ध्या तासानं कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा विधानसभेत पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ सुरु झाला. यानंतर हे कामकाज आता उद्यासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

दरम्यान शिवसेना नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली तेव्हा धक्काबुक्कीच्या वृत्ताचं खंडन करत ते म्हणाले, “आमच्यात कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. आम्ही केवळ बॅनर खाली खेचण्याचा प्रयत्न केला. विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षाला वारंवार सांगत होते की, बॅनर फडकवू नका तरीही ते ऐकत नसल्यानं आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. आम्हाला आज विदर्भातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची होती. परंतु आता कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे 5 दिवसांचंच आहे. त्यातील आजचा दिवस कामकाज तहकूब केल्यानं केवळ 3 दिवस बाकी आहेत. आज दुसऱ्या दिवशी देखील यात कोणतीही महत्त्वाची चर्चा झालेली नाही. आता आगामी 3 दिवसांत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते की, नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/